पुण्यातील "आपला जनसंवाद" या पाक्षिकात माझे आरोग्य विषयक काही लेख छापून आले आणि मला गेल्या दीड महिन्यात पुण्यातून साधारण पाचशेपेक्षा अधिक फोन आले. लेखातील विषयाच्या अनुषंगाने आपल्या शारीरिक समस्यांवर चर्चा केल्यानंतर यापैकी सत्तर टक्के लोकांनी आपल्या किंवा आपल्या परिवारातील एखाद्या व्यक्तीच्या लठ्ठपणाचा आणि वाढत्या वजनाचा विषय काढलाच. त्यामुळे वाढत्या शहरीकरणातील बदलत्या जीवनपध्दतीने दिलेल्या या वाढत्या वजनाच्या घातक देणगीवर काही लिहावे असे मला वाटू लागले. त्यातूनच हा लेखप्रपंच करीत आहे.
सगळ्यात आधी लठ्ठपणा निर्माण होण्यामागची कारणे कोणती हे पाहू -
१. अतिसेवन - वारंवार खात राहणे, फास्ट फूड खाणे, तेलकट, मसालेदार आणि चरबीयुक्त अन्नाचे सतत सेवन, मद्यपान, अमर्याद चहा आणि कॉफी यांचे सेवन, हॉटेलमध्ये वारंवार जेवणे
२. अवेळी भोजन - दोनवेळा आणि वेळा ठरवून जेवणे हे निसर्गाच्या नियमाला धरुन आहे. पण, या नियमाचे पालन केले नाही आणि वेळ मिळेल तेव्हा अथवा वाट्टेल तेव्हा भोजन केले की वजन वाढते.
३. जेवणाची चुकीची पध्दत - गडबडीत जेवणे, टी.व्ही पहात अथवा वाचन करत जेवणे, गप्पा मारत जेवणे, जेवल्यावर ताट बाजूला सरकवून तिथेच लगेच झोपणे.
४. विरुध्द अन्न खाणे - मासे, दूध, दही, फळे, पनीर हे आणि यापासून बनविलेले पदार्थ एकमेकांच्या विरुध्द आहेत. त्यांचे एकाचवेळी सेवन करणे. जिभेवर ताबा न ठेवता काहीही आणि कधीही, कसेही खाणे.
५. व्यायामाचा अभाव - वजन वाढण्याचे हे सगळ्यात मुख्य कारण आहे. एकाच जागी बसून काम करणे, अजिबात व्यायाम न करणे, चालण्याचा कंटाळा करणे.
६. काही पदार्थांचे वारंवार सेवन - पुरण पोळी, बासुंदी, श्रीखंड, मासे, मटण, अंडी, पनीर, मिठाई, हलवा, रबडी, दही हे पदार्थ वारंवार खाण्याने लठ्ठपणा वाढत असतो.
७. अनुवंशिकता - काही व्यक्तींमध्ये लठ्ठपणा ही अनुवंशिकता असते. त्यांनी वजन कमी करण्यासाठी फार कडक उपाययोजना करु नयेत. अशांनी यासाठी तज्ज्ञांना प्रत्यक्ष भेटावे आणि उपाय करावेत.
८. थायरॉईड - थायरॉईड ग्रंथींचे कार्य बिघडले तर काही व्यक्तींना लठ्ठपणा अथवा वजन वाढण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे शरीरात अचानक बदल झालाय असे लक्षात आले तर तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटून थायरॉईडची समस्य़ा आहे का याचे निदान करुन घ्यावे.
९. चिंता - वारंवार चिंता करणे, सतत ताण तणावात राहणे यामुळेही वजन वाढते.
लठ्ठपणामुळे अथवा वाढत्या वजनामुळे ब्लडप्रेशर, डायबेटीस (मधुमेह), संधीवात, आमवात, हृदयरोग, त्वचा विकार, पित्ताशयाशी निगडीत व्याधी, मूतखडा, नपुसंकता, लैंगिक समस्या, चक्कर येणे, श्वसनाचे आजार, दम लागणे, लवकर म्हातारपण येणे असे गंभीर आजार होवू शकतात. त्यामुळे वाढत्या वजनाकडे वेळीच लक्ष देणे आणि ते अटोक्यात ठेवणे गरजेचे आहे.
लठ्ठपणा किंवा वजन कमी कऱण्याची दशसूत्री -
१. रोज सकाळी उठल्यावर अनुषापोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळावा, एक चमचा मध घालावा आणि ते प्यावे. यानंतर अर्धा तास काहीही खावू नये. या अर्ध्या तासात साधारण २ कि.मी. चालण्याचा व्यायाम करावा. दर आठवड्याला हे अंतर एका किलोमीटरने वाढवत पाच किलोमीटरपर्यंत जावे. नंतर एवढे रोज चालावे.
२. सकाळचा नाष्टा आणि दुपारी जेवण ही पध्दत बंद करावी. त्याऐवजी सकाळी ९ ते १० यावेळेत पूर्ण जेवण घेण्याची सवय करावी. दुपारी भूक लागलीच तर काकडी खावी. रात्रीचे जेवणही संध्याकाळी ६ ते ८ यावेळेत घ्यावे. सकाळच्या जेवणाच्या निम्म्याप्रमाणात रात्री आहार घ्यावा. रात्री जेवल्यानंतर किमान दोन तासांनी झोपावे. दोन्हीवेळेस जेवणाच्या आधी एक तास, जेवताना आणि जेवण झाल्यावर दीड तास अजिबात पाणी पिऊ नये.
३. दोन्हीवेळच्या जेवणाच्या आधी एक तास एक फ्लॅक्स सीड कॅप्सूल घ्यावी. दोन्हीवेळच्या जेवणानंतर लगेच फक्त घोटभर कोमट पाण्यासोबत एक स्पिरुलिना आणि एक मोरिंगा कॅप्सूल घ्यावी. रात्री झोपताना दोन व्हिटग्रास कॅप्सूल्स कोमट पाण्यासोबत एकाचवेळी घ्याव्यात. बाजारातून या कॅप्सूल्स घेताना त्याच्या शुद्धतेबाबत पूर्ण दक्षता घ्यावी. ते शक्य नसेल तर माझ्याशी संपर्क करावा. अतिशय उत्तम गुणवत्तेच्या आणि शुद्धतेच्याबाबतीत खात्रीशीर असलेल्या या कॅप्सूल्स मी तयार करतो. त्या मी तुम्हाला कुरीअरने घरपोहोच पाठवून देऊ शकतो.
४. मसालेदार पदार्थ, फास्ट फूड, मांसाहार, हॉटेलचे खाणे आणि जेवणे, गोड पदार्थांचे भरपूर सेवन, चरचरीत आणि चमचमीत पदार्थ, बेकरीचे पदार्थ, शिळे अन्न, पापड, लोणचे, केळी, आंबा, सिताफळ, दही, लोणी, तूप, पनीर, तूरीची डाळ हरभरा, उडीद, वांगी, बटाटा, घेवडा, पावटा हे पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करावे.
५. पालेभाज्या, फळभाज्या, मूग, मसूर, मटकी, साय काढलेले दूध, लोणी काढलेले ताजे ताक यांचा आहारात समावेश अवश्य करावा. दूध शक्य असेल तर गाईचे वापरावे.
६. मेथी १०० ग्रॅम, ओवा ४० ग्रॅम आणि काळे जिरे २० ग्रॅम आणावेत. लोखंडाच्या कढईत हे तिन्ही वेगवेगळे साधारण लालसर होईपर्यंत भाजून घ्यावेत. नंतर एकत्र करुन त्याचे चूर्ण करावे. रोज रात्री झोपताना व्हिटग्रास कॅप्सूल घेतल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यासोबत हे चूर्ण एक चमचा घ्यावे.
७. दर महिन्यातून एकदा रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे साजुक तूप घालून प्यावे. यामुळे दुसरे दिवशी सकाळी पोट साफ होत असल्याने हा प्रयोग सुट्टीच्या आधल्या रात्री करावा.
८. जाहिराती पाहून अथवा नेटवर्क मार्केटिंग कंपन्यांच्या विक्रेत्यांचे ऐकून वजन कमी करण्यासाठी कसल्याही गोळ्या, पावडर, विविध प्रकारचे ज्यूस, औषधे आणि उपवास यांचे प्रयोग करु नयेत. असे प्रयोग वजन कमी करतीलही पण त्यामुळे शरीराचे नुकसानही होवू शकते. म्हणून असे काही प्रयोग करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
९. शीतपेये, फ्रीजमधील पदार्थ, थंड पदार्थ, थंड पाणी अजिबात सेवन करु नये. शक्य असेल तर सगळ्याच ऋतुत कोमट पाणी पिणे अधिक चांगले. चहा, कॉफी पूर्णपणे बंद करावी.
१०. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आहारातून साखर पूर्णपणे हद्दपार करावी. त्याजागी गुळाचा वापर करावा. " साखरेचे खाणार त्याला लठ्ठपणा येणार " हे नेहमी लक्षात ठेवावे.
या सगळ्याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट करणे गरजेचे आहे. ताण तणावातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. ते शक्य नसेल तर दररोज किमान एक तासभर मनाला आनंद देणारा एखादा छंद जोपासावा. जुनी गाणी, शास्त्रिय संगीत ऐकावे, हलके फुलके वाचन करावे, निखळ करमणूक करणारे कार्यक्रम पहावेत. डोक्याला ताण देणा-या आणि रडक्या मालिका पाहू नयेत. महिन्यातून एकदा निसर्गाच्या सान्निध्यात शक्य तेवढे पायी फिरावे. आध्यात्माची आवड असेल तर त्यातील ध्यान धारणेसारखे मनाला शांत करणारे प्रयोग करावेत. तीर्थक्षेत्रांना जावे.
वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणा-यांनी दोन गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे, मला वाटते म्हणून माझे वजन वाढले आहे, याला काही अर्थ नाही. तुमच्या उंचीला १२ ने गुणल्यावर जे उत्तर येईल त्यापेक्षा अधिक तुमचे वजन असू नये, असे मानले जाते. (उदा. उंची ५ फूट ४ इंच असेल तर त्याला गुणीले १२ म्हणजे ६४ ते ६५ किलोपेक्षा अधिक वजन असणे उचित नाही) तर दुसरी गोष्ट म्हणजे, दरमहा एक ते तीन किलो याच प्रमाणात वजन कमी होणे योग्य आहे. झपाट्याने वजन कमी झाले तर ते घातक असते.
केवळ डाएट करुन, केवळ औषधे घेवून अथवा केवळ भरपूर व्यायाम करुन लठ्ठपणा किंवा वजन कधीच कमी होणार नाही. योग्य आहार, योग्य आणि आवश्यक तेवढा व्यायाम, योग्य औषधांचे सुयोग्य नियोजन आणि पचनशक्ती वाढवून स्थूल तसेच सूक्ष्म पचनात आणलेली सूसूत्रता यामुळेच वजन कमी कऱण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत.
डॉ. आनंद कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर, जि. कोल्हापूर
मो. 7744964550
ई मेल -asknaturopathy@gmail.com