भारत
सरकारच्या आयुष मंत्रालयाने 18 नोव्हॆंबर हा नॅचरोपॅथी डे म्हणून साजरा करण्याचा
निर्णय जाहीर केला. त्यानुसार सध्या देशभरात 11 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर असा
निसर्गोपचार सप्ताह साजरा करण्यात आला. यानिमित्त निसर्गोपचाराचा परिचय करुन घेणे
आणि त्याचा उपयोग आपल्या निरोगी आयुष्यासाठी करणे नक्कीच फायद्याचे आहे. साधे,
सोपे, अत्यल्प खर्चाचे आणि कसलाही धोका नसलेले प्रभावी उपचार म्हणून निसर्गोपचार
आता जगात मोठ्य़ा प्रमाणात स्वीकारले जात आहेत.
प्रश्न – नॅचरोपॅथी डे साजरा करण्यामागील कारण काय असावे
?
उत्तर - निसर्गोपचार ही माणसाचा निसर्गाशी तुटलेला संबंध पुन्हा जोडणारी पध्दती
आहे. हा केवळ आजारावरचा उपचार नाही तर आजार निर्माणच होवू नये यासाठी शरीर सुदृढ
बनविणारी निसर्गोपचार ही जीवनशैली आहे. यामध्ये औषधांचा वापर केला जात नाही
त्यामुळे निसर्गोपचार स्वस्त आणि सुरक्षित आहे. अशा या उपचारपध्दतीचा प्रसार आणि
प्रचार भारतात फारसा झालेला दिसत नाही. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या
तत्वानुसार आजारी पडल्यावर धावाधाव करण्यापेक्षा आजार निर्माणच होवू नये अशी
व्यवस्था करणे कधीही फायद्याचेच आहे. यामुळे सरकारला निसर्गोपचाराचे महत्व पटले
आहे. या सर्वसामान्यांना परवडणा-या उपचार पध्दतींचा प्रचार आणि प्रसार भारतात
व्हावा यासाठी जागृती करणे हा या नॅचरोपॅथी डे मागील मुख्य उद्देश आहे.
प्रश्न - निसर्गोपचार म्हणजे नेमके काय ?
उत्तर - ही सृष्ठी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या
पंचमहाभूतांपासून बनलेली आहे. आपले शरीरही याच पंचमहाभूतांपासून बनलेले आहे.
त्यामुळे शरीरातील कोणताही बिघाड या पंचमहाभूतांच्या उपयोगाने दुरुस्त करता येतो
असे निसर्गोपचार मानतो. थोडक्यात सांगायचे झाले तर पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे
पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू म्हणजे शुध्द हवा आणि आकाश म्हणजे मोकळी जागा यांचा
उपयोग करुन केलेले उपचार म्हणजे निसर्गोपचार असे म्हणता येईल. या पंचमहाभूतांचा वेगवेगळ्या स्वरुपात वापर
करुन हे उपचार केले जातात.
प्रश्न – निसर्गोपचार पध्दतीचा शोध कुणी लावला आणि ती भारतात कशी आली ?
उत्तर – निसर्गोपचार पध्दती
नवीन नाही. निसर्गोपचारातील अनेक उपचार भारतातही प्राचीन काळात वापरले जात होते.
पण त्याला निसर्गोपचार असे नाव नव्हते. उपचार पध्दती म्हणून निसर्गोपचाराला विकसित
करण्याचे काम साधारण दीडशे वर्षांपूर्वी झाले. सन 1826 मध्ये जर्मनीतील ग्रॅफेनबर्ग
इथे डॉ. विन्सेन्ट प्रिसनिझना यांनी पहिले निसर्गोपचार चिकित्सागृह सुरु केले.
पाण्याचा विविध प्रकारानी उपयोग करुन त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले.
नंतरच्या काळात जगभरातील विविध अभ्यासकांनी यात आपल्या प्रयोगांनी भर घालून
निसर्गोपचार समृध्द बनवला. जर्मनीचे डॉ. जोहानिस स्कॉथ, फादर सॅबॅस्टियन नीप, डॉ.
हॅब्रिक लेमॅन, लुई कुह, डॉ. अडॉल्फ जस्ट, ऑस्ट्रीयाचे बॉरनॉल्ड स्किली, अमेरिकेचे डॉ.
जेम्स जॅक्सन, डॉ. रसेल ट्राल, डॉ. जे. एच. कॅलॉग, डॉ. हेनरी लिंडल्हेर, डॉ. जे.
एच. टिल्डंजना, डॉ. बर्जार मॅकपोड, डॉ. बेनेडिक्ट लस्ट, डॉ. विग्मोर अशा अनेकांचा
यात समावेश आहे.
भारतात महात्मा गांधी यांनी सन 1913 ते 1916 या काळात दक्षिण अफ्रिकेत
निसर्गोपचाराचा आश्चर्यकारक अनुभव घेतला होता. त्याचवेळी भारतातील या
उपचारपध्दतींचे अनन्यसाधारण महत्व त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे भारतात
परतल्यावर त्यांनी निसर्गोपचाराचा जोरदार प्रसार केला. पुणे सोलापूर रस्त्यावर
उरळीकांचन इथे 1946 मध्ये त्यांनी निसर्गोपचार आश्रम सुरु केला. त्यानंतर
मोरारजीभाई देसाई, डॉ. दिनशा मेहता, डॉ. लक्ष्मण शर्मा, डॉ. जानकीशरण शर्मा, डॉ.
कुलरंजन मुखर्जी, डॉ. विठ्ठलदास मोदी, डॉ. जे. एस. जासावाला, डॉ. एम. एम. भमगरा,
डॉ. एस. जे. सिंध, डॉ. रमणलाल एंजिनियर, डॉ. कृष्ण वर्मा, डॉ. शंकरभाई दवे, डॉ.
भूपतराय दवे यांनीही आपल्या अभ्यास आणि प्रयोगातून या उपचारपध्दतीत मोलाची भर
घातली.
प्रश्न - प्रत्येक उपचारपध्दतीचा सिध्दांत असतो. तसा निसर्गोपचार पध्दती
नेमक्या कोणत्या सिध्दांतावर
कार्य करते ?
उत्तर - निसर्गोपचार पध्दती तीन प्रमुख सिध्दांतावर
कार्य करते. शरीरात साठलेली विषद्रव्ये हे सगळ्या रोगांच्या मागचे कारण आहे, हा या
उपचार पध्दतीचा मूळ सिध्दांत आहे.
त्यामुळेच साथीच्या रोगात विषाणूंना अँटीबायोटिक्सने मारुन तात्पुरता उपाय
करण्यापेक्षा विषाणूंच्या वाढीला पोषक विषद्रव्यांचा शरीरातून निचरा करुन शरीर
आतून स्वच्छ करण्यावर निसर्गोपचारात भर दिला जातो.
रोगाचे निवारण निसर्गच करतो, औषधे किंवा डॉक्टर रोगनिवारण करीत नाही हा या
उपचार पध्दतीचा दुसरा सिध्दांत आहे. त्यामुळेच आजारांवर भरमसाठ औषधांचा मारा
करण्यापेक्षा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकडे निसर्गोपचाराचा कल आहे.
अन्न हेच औषध आणि अन्न हेच विष आहे हा निसर्गोपचाराचा तिसरा सिध्दांत आहे.
योग्य वेळी, योग्य पध्दतीने आणि योग्य प्रमाणात घेतलेले अन्न औषधांसारखे काम करते
असे निसर्गोपचार मानतो. त्यामुळे निसर्गोपचारात आहाराला खुप महत्व आहे.
प्रश्न – निसर्गोपचार कोणकोणत्या आजारात उपयुक्त आहे ?
उत्तर – ज्या आजारांमध्ये
शस्त्रक्रिया टाळताच येत नाही असे आजार वगळता बाकी बहुतेक सगळ्या आजारात
निसर्गोपचार उपयुक्त आहे. मुळातच सगळे दवाखाने करुन झाले की रुग्ण आता हे करुन
पाहू म्हणून निसर्गोपचाराकडे वळतात आणि आश्चर्यकारकपणे बरे होतात. याचे प्रमुख
कारण म्हणजे आधुनिक वैद्यकाने आजाराला वेगवेगळी नावे दिली असली तरी ही सगळी नावे
लक्षणांवर आधारित आहेत. निसर्गोपचारात या सगळ्या लक्षणांचे कारण एकच असले पाहिजे
असा विचार केला जातो. त्यामुळे रोगाच्या मुळावर उपचार होतो. शरीरातील पचनसंस्था,
उत्सर्जन संस्था आणि मज्जासंस्था यांना बळकट बनवले जाते त्यामुळे शरीरातील
विषद्रव्ये वेळेवर बाहेर पडतात, खालेले अन्न योग्य प्रकारे पचते आणि त्यातील
शरीरोपयोगी घटकांचा पूर्ण उपयोग होतो. मज्जासंस्था बळकट झाल्याने शरीरातील अंतर्गत
संदेशवहन चांगले होते म्हणून निसर्गोपचार बहुतेक सगळ्याच आजारात प्रभावी आहे.
प्रश्न – निसर्गोपासना आणि निसर्गोपचार यात फरक काय ?
उत्तर - निसर्गोपासना म्हणजे नैसर्गिक अवस्थेकडे परत
जाणे. आधुनिकतेचा त्याग करुन नैसर्गिक अवस्थेत जगणे. अधिकाधिक नैसर्गिक राहणे.
सध्याच्या युगात हे शक्य नाही. निसर्गोपचारात असा हट्ट नाही. निसर्गातील घटकांचा
उपयोग करुन आरोग्य राखण्यावर भर आहे. आधुनिकतेचा उपयोग करुन घेण्यास हरकत नाही पण
त्याचे गुलाम न होता अधिकाधिक निसर्गाशी जवळीक साधणारी जीवनशैली म्हणजे
निसर्गोपचार. अयोग्य आहार, शारीरिक श्रमाचा अभाव, अनियमित जीवन, व्यसने, मानसिक
ताण तणाव, औषधांचा अविचारी वापर या सहा कारणांनी माणसाच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक
शक्तीचा नाश होतो असे निसर्गोपचार मानतो. त्यासाठी सगळे सोडून जंगलात रहायला जायची
गरज नाही तर आधुनिक जगातही जीवनशैलीतील बदलातून या सहा कारणांना दूर ठेवता येते
असे निसर्गोपचार मानतो.
प्रश्न - निसर्गोपचार पध्दती
रोजच्या जीवनात कशी वापरावी ?
उत्तर - निसर्गोपचार पध्दती रोजच्या जीवनात
वापरण्यासाठी आपल्या दिनचर्येत काही बदल करणे आवश्यक आहे. यासाठी हे मुद्दे
उपयुक्त ठरतील –
1.
शरीरात
विषद्रव्ये आम्लाच्या स्वरुपात असतात म्हणून शरीरात आम्लाचा साठा होवू देणे अयोग्य
आहे. यासाठी आहारातील क्षारांतक पदार्थांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.
2.
रात्री
लवकर झोपणे आणि पहाटे लवकर उठणे आवश्यक आहे. जाग्रणे करु नयेत.
3.
आपल्याला
मानवेल आणि सोसेल असा व्यायाम दररोज करणे आवश्यक आहे. शरीराची अधिकाधिक हलचाल
करावी.
4.
जेवताना
पूर्ण लक्ष जेवणाकडे असावे. टी.व्ही. मोबाईल पहात जेवण करु नये.
5.
प्राणायाम,
ध्यानधारणा, निसर्गरम्य ठिकाणी काही काळ घालवणे, एखादा छंद जोपासणे आवश्यक आहे.
6.
चहा, कॉफी
अशा पेयांपासून दूर रहावे, व्यसनांपासून मुक्त व्हावे.
7.
पॉलिश
नसलेले धान्य, रिफाईंड नसलेली तेलं यांचा वापर करावा. पिशवीतील दुधापेक्षा शक्यतर
देशी गाईचे दूध धार काढल्यावर आणून घरात तापवून वापरावे. गाईचे उपलब्ध नसेल तर
म्हशीचे चालेल. जर्सीचे दूध अजिबात वापरू नये.
8.
निसर्गोपचार
तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपवास, सूर्यस्नान, वायुस्नान, बाष्पस्नान, मातीलेपन यांचा
उपयोग करावा
9.
मुलामुलींनी
मैदानी खेळांवर अधिक भर द्यावा.
10.
टीव्ही, फ्रीज, एसी, मोबाईल आणि वाहने यांचा
वापर मर्यादित करावा.