उन्हाळा सुरु झाला तसं वाढते ऊन आणि त्यापासून होणारे त्रास यांच्यापासून बचाव कसा करायचा अशी विचारणा करणा-यांची संख्या वाढू लागली आहे. सुखासीन जीवनशैलीला कवटाळताना आपण निसर्गाला पुरते विसरलो आहोत. खरं तर वाढत्या उन्हाळ्यापासून बचाव करण्याची यंत्रणा आपल्या शरीरातच परमेश्वर कृपेने कार्यरत असते यावर आमचा विश्वासच नाही. त्यामुळे कृत्रिम साधनांचा आमचा शोध संपतच नाही. साहजिकच ही कृत्रिम साधने जशी तात्पुरता फायदा देतात तशी दीर्घकालीन नुकसानही न कळत पदरात घालून जातात.
यासाठीच वाढत्या उन्हाळ्यात होणारे काही सर्वसामान्य त्रास प्रथम पाहू.
1. पित्ताचा त्रास - यामध्ये आंबट किंवा कडू गुळण्या येणे, उलट्या होणे, डोके दुखणे, जळजळणे, अंगावर पुरळ, गांध्या किंवा लाल चट्टे उठणे, अंग खाजणे, पित्तजन्य त्वचारोग उफाळून येणे अशा त्रासांचा समावेश करता येईल.
2. पचन विकारातील बिघाड - यामध्ये अपचन, वारंवार पातळ शौचाला होणे, बध्दकोष्ठाचा विकार बळावणे, मुळव्याध, भूक कमी होणे, पोटात दुखणे अशा त्रासांचा समावेश करता येईल.
3. अकस्मात होणारे त्रास - चक्कर येणे, खूप थकवा येणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, ताप येणे, सनस्ट्रोक होणे, उन्हाळे लागणे म्हणजे लघवीला जळजळ होणे आणि लघवी थोडी थोडी होणे.
उन्हाळ्यात होणा-या त्रासांपासून बचाव करण्याच्या काही अगदी सोप्या आणि पूर्ण नैसर्गिक उपायांकडे आता थोडे पाहू -
1. उन्हाळ्यात दुपारी 12 ते 4 यावेळेत उन्हातून फिरण्याचे टाळावे. अगदीच पर्याय नसेल तर डोक्याला टोपी घालावी किंवा रुमाल बांधावा. विदर्भ, मराठवाड्यात टोपीखाली अथवा रुमालाखाली कांदा ठेवतात.
2. उन्हातून आल्यावर लगेच उभ्याने गटागट पाणी पिऊ नये. बाहेरुन आल्यावर प्रथम हात पाय स्वच्छ धुवावेत. पाच ते दहा मिनिटे खुर्चीत किंवा बैठकीवर स्वस्थ बसावे. नंतर तहान लागली असेल तरच खाली बसून घोट घोट पाणी प्यावे. पाणी रुम टेंम्परेटरचे प्यावे किंवा मातीच्या मडक्यातील वाळा घातलेले प्यावे. फ्रिजमधील आणि प्लॅस्टिकच्या बाटल्यातील थंड पाणी हानीकारक असते.
3. उन्हातून आल्यावर लगेच एसी, कुलर किंवा पंखा सुरु करु नये. उन्हातून सावलीत आल्यावर शरीराला हा बदल सामावून घेण्यास पाच ते दहा मिनिटांचा अवधी द्यावा. या काळात घाम आला तर वैतागू नये. निसर्गाला त्याचे काम कऱण्यासाठी वेळ द्यावा. शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्याचे काम यातून होत असते. घाम सुती रुमालाने पुसून घ्यावा.
4. सकाळचे जेवण 10 पूर्वी करावे आणि रात्रीचे 7 पूर्वी करावे. दुपारच्या वेळात भूक लागलीच तर हलका नाष्टा, ताक घातलेली नाचणीच्या पिठाची आंबील, घरी बनवलेला मठ्ठा, कलिंगड, द्राक्षे, संत्र, मोसंबी, अंजीर, आंबा अशी फळ यापैकी काहीतरी खावे. सकाळच्या निम्मा आहार रात्री घ्यावा.
5. लहानमुलांना आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या किंवा वैद्यांच्या सल्ल्याने जंत आणि कृमींंचे औषध द्यावे.
6. उन्हाळ्याच्या दिवसात सुती आणि सैल कपड्यांचा उपयोग करावा. जाडे भरडे आणि घट्ट कपडे वापरु नयेत. त्यामुळे त्वचारोग होण्याचा धोका असतो. कपडे स्वच्ठ धुतलेले वापरावेत. कपड्यांचा रंग भडक आणि गडद नसावा. फिकड रंगाचे किंवा पांढरे कपडे अधिक चांगले असतात.
7. उन्हाळ्याच्या दिवसात शीतपेय, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रिम यांचा वापर वरुन थंडावा देत असला तरी याचे अंतिम परिणाम वाईट होतात. त्यामुळे या गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात. त्याऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत, सोलकढी, ताक, मठ्ठा, विविध प्रकारांची सरबते, गुलकंद, अल्प प्रमाणात लस्सी यांचा उपयोग करावा. चहा आणि कॉफी बंदच करावी. शक्य नसेल तर प्रमाण 75 टक्क्यांनी कमी करावे.
8. उन्हाळ्याच्या दिवसात तळकट, मसालेदार, मांसाहार, चमचमीत, तिखट पदार्थ टाळावेत. गाड्यावर, हॉटेलमध्ये अगदीच पर्याय नसेल तर खावे. पण अधिकाधिक वेळेस घरच्या खाद्यपदार्थांचा आणि घरच्या जेवणाचा उपयोग करावा.
9. काही सोपे उपाय -
तळपायाची आणि डोळ्यांची जळजळ होत असेल तर रात्री झोपताना तळपायाला एरंडेल तेल लावून हलक्या हातानी चोळून जिरवावे. दुधात बुडवलेली कापडाची घडी दोन्ही डोळ्यांवर ठेवावी.
उन्हाळे लागले असेल ( लघवीला कमी होणे, लघवी करताना जळजळणे) तर रात्री झोपताना एक ग्लास पाण्यात एक चमचा धणे भिजत घालावेत. सकाळी ब्रश झाल्यावर धणे काढून पाणी प्यावे. बेंबीवर ओल्या कापडाची घडी ठेवावी.
नाकातून रक्तस्त्राव झाल्यास टाळूवर पाणी थापावे. कांदा फोडून हुंगण्यास द्यावा. रक्तस्त्राव एवढ्याने थांबला नाही तर लगेच वैद्यांना किंवा डॉक्टरांना दाखवावे.
घामोळे आले असेल तर साबण वापरणे बंद करावे. हरभ-याच्या डाळीचे पीठ, दुधाची साय एकत्र करुन आंघोळ करताना लावावी. हळद आणि चंदनाचा समावेश असलेले उटणे लावावे.
चक्कर आल्यास किंवा सनस्ट्रोक झाल्यास तात्काळ वैद्यांना किंवा डॉक्टरांना दाखवून उपचार घ्यावेत.
ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांना Cap. Aloe Vera आणि Cap. Aamalaki यांचे सेवन फायद्याचे ठरेल. या कशा घ्यायच्या ते त्या पाठवताना सोबत लिहून देतो. यासाठी माझ्याशी व्क्तीगत व्हॉटस अप किंवा फोनवर संपर्क साधावा.
10. घरात तांब्याची घागर असेल तर ती भरुन सकाळी 8 वाजता उन्हात ठेवावी आणि सायंकाळी पाच वाजता त्यातील गरम पाण्याने स्नान करावे. याला झळवणी घेणे असे म्हणतात. यामुळे उन्हाळा बाधत नाही. घरातील 12 वर्षांच्या आतील मुलांना हे स्नान अवश्य घालावे.
याप्रमाणे उपाय योजना केल्यास एरव्ही तापदायक ठरणारा उन्हाळा ब-याच अंशी सुसहाय्य ठरेल. अर्थातच हे उपाय करुनही उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर वैद्याचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आनंद कुलकर्णी
निसर्गोपचार सल्लागार
जयसिंगपूर 416101 जि. कोल्हापूर
मोबाईल - 7744964550 (व्हॉटस अँप)
No comments:
Post a Comment