News From Us

News from Us - 1.हिमालयातून थेट तुमच्या घरात शुध्द आणि नैसर्गिक शिलाजीत आता उपलब्ध आहे. 20 ग्रॅमची डबी 1000 रुपये किंमत आहे. 2. आमच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी आम्हाला महाराष्ट्रभर प्रतिनिधी हवे आहेत. इच्छुकांनी 7744964550 वर संपर्क करावा.

Sunday, 30 November 2014

वरुन साधा पण गंभीर आजार - असिडिटी


सलग चार दिवस कोल्हापुरातून एका रुग्णाचा मला सतत फोन येत होता. 'मला प्रचंड पित्ताचा त्रास होत आहे, अनेक उपाय केले पण काही फायदा नाही. निसर्गोपचारात यासाठी काही औषध आहे का ?' त्यांचा प्रश्न साहजिकच होता. नैसर्गिक होता. आजारी पडले की औषध घ्यायचे असा पायंडाच पडला आहे. त्यामुळे त्यांचा हा प्रश्न आला. आजार हे आपल्या कर्तृत्वाचे फळ असते आणि तो औषधांशिवाय बरा होऊ शकतो, हे त्यांच्या कल्पनेतही न बसणारे होते. म्हणूनच ते औषधाच्या मागे धावत होते. मी ही त्यांना औषधच देणार अशी त्यांची ठाम समजूत होती. प्रत्यक्षात जेव्हा मी त्यांना सांगितले की, मी कसलेही औषध देत नाही, तेव्हा त्यांचा विश्वासच बसेना. औषध न घेता मी बरा कसा होणार? असा एक प्रश्न त्यांच्या चेहर्यावर मला जाणवला. आजार हे जर आपल्या कर्तृत्वाचे फळ असेल तर कर्तृत्व सुधारल्यावर आपण ठणठणीत व्हायला हवे, हे मला त्यांना पटवून सांगावे लागले. प्रत्येक माणसाच्या शरीरात एक नैसर्गिक शक्ती असते ती त्याला बरे करीत असते, या शक्तीला तिचे रोग निवारणाचे काम करण्यास जो वेळ लागतो तो सुसहाय्य करण्यासाठी औषधे असतात हा निसर्गोपचाराचा सिध्दांत आहे, हे त्यांना पटवून द्यावे लागले. त्यानंतर त्यांनी माझे ऐकण्याचे मान्य केले. पित्त, त्याचे त्रास आणि त्यावरचे उपाय या सगळ्यांचा विचार करण्यापूर्वी आपणाला पित्त म्हणजे काय ? हे जाणून घेणे गरजेचे आहे. आपण जे अन्न सेवन करतो त्याचे पचन होऊन त्यातील उपयुक्त भाग बाजूला करण्याचे, त्याचे रक्तात शोषण करण्याचे आणि उरलेला चोथा शरीरातून बाहेर टाकण्याचे काम पोटात होत असते. या सगळ्या प्रक्रियेत पोटातील विविध अवयव आपापली भूमिका पार पाडत असतात. पचनासाठी आवश्यक असणार्या हायड्रोक्लोरिक आम्लाची निर्मिती पोटात होत असते. भुकेच्या वेळी अनेकांच्या पोटात जो आगडोंब उसळतो तो याच आम्लामुळे. अनैसर्गिक जीवन जगण्याच्या सततच्या प्रकारामुळे या आम्लाची अधिकप्रमाणात निर्मिती होते आणि त्यातूनच ऍसिडिटीची लक्षणे दिसू लागतात. आयुर्वेदाच्या तत्वज्ञानानुसार पचन करणार्या स्त्रावांमध्ये पाचक पित्त असते. ते जेव्हा द्रव आणि सरगुणांनी वाढते तेव्हा आम्लपित्त होते. शरीरातील रक्ताची आम्लता ज्यात मोजली जाते त्याला पीएच असे म्हणतात. हा पीएच सात असेल तर रक्त नॉर्मल असते. पण, पीएच सात पेक्षा कमी होणे म्हणजे रक्तात आम्लतेचे प्रमाण वाढणे होय. शरीर नेहमी निरोगी रहायचे असेल तर रक्त नेहमी अल्कलीप्रधान असणे आवश्यक आहे. शरीरात आम्लता वाढली की त्याचा मुकाबला करण्यासाठी शरीरातील अनेक उपयुक्त क्षारांचा उपयोग केला जातो. त्यामुळे क्षारांचा शरीरातील साठा कमी होतो आणि त्यातून चिडखोरपणा वाढणे, स्मरणशक्ती कमी होणे, सर्दी, झोप न लागणे, सांधेदुखी, रक्तदाबाचे विकार, एकाग्रता कमी होणे असे विकार मागे लागतात. त्याशिवाय अकाली वृध्दत्वही येते. ऍण्टासीडच्या काही गोळ्या चघळल्या की तात्पुरता आराम मिळतो. पण, अधिक पित्त तयार होण्याची प्रक्रिया थांबत नाही. यातून पुढे अल्सरसारखे आजारही होण्याची शक्यता असते. त्यामुळेच पित्ताचा विकार हा साधासुधा आजार नाही तर रुग्णाचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा तिन्ही स्तरावर शोषण करणारा आजार असल्याने तो गांभीर्यानेच घ्यायला हवा. मरण ही दीर्घकालीन रक्ताम्लतेची अंतिम स्थितीच असते. त्यामुळे असिडिटी ही साधी शिक्षा नाही तर ती जन्मठेपच आहे, असे म्हणावे लागेल. खरे तर पित्ताचा त्रास सुरु झाल्यानंतर कोणती औषधे घेऊन तो कमी करायचा याचे चिंतन करण्यापेक्षा त्रास सुरु का झाला? हे शोधणे गरजेचे आहे. औषधाने त्रास कमी होईल पण, मूळ कारण तसेच राहिल्याने आजार बरा होणार नाही. आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचे झाले तर, 'लक्षणे कमी होतील पण, व्याधी तशीच राहिल'. जोपर्यंत व्याधी शरीरात आहे तोपर्यंत औषधांनी लक्षणे कितीदाही कमी केलीत तरी ती पुन्हा पुन्हा उद्भवत राहतील. त्यामुळे ऍण्टासीडच्या गोळ्या हा यावरचा उपाय नाही, ती तात्पुरती मलमपट्टी आहे. त्या घेत दिवस ढकलण्यापेक्षा पित्ताचा त्रास होण्याची कारणे शोधून ती दूर करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे ढोबळमानाने विचार केला तर पित्ताचा (असिडिटी) त्रास सुरु झाल्यानंतर खालील लक्षणे जाणवतात. १) मळमळणे आणि उलट्या होणे. उलटी होताना तोंडात आंबट-कडवट चव असते. २) तोंडात पाणी सुटणे, आंबट गुळण्या येणे ३) डोके दुखणे, चक्कर येणे. ४) पोटात दुखणे, छातीत जळजळल्या सारखे होणे. ५) अंगावर तांबूस रंगाचे फोड किंवा गांध्या येणे. अंगाला खाज सुटणे. ६) निरुत्साही वाटणे. ७) यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर पुढे केस गळणे, अकाली पांढरे होणे यासह यकृताशी संबंधित काही गंभीर आजार होऊ शकतात. पित्ताचा त्रास होण्याची कारणे- १) मद्यपान, धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे व्यसन. २) व्यायामाचा अभाव ३) रात्री उशीरापर्यंत जागण्याची आणि सकाळी उशीरा उठण्याची सवय ४) चहा आणि कॉफीसारख्या पेयांचा अतिरेक ५) मसालेदार, अति तिखट, तेलकट, चमचमीत खाण्याची आवड. विशेषत्वाने फास्ट फूड, भेळ, आंबवलेले पदार्थ, वडापाव, हॉटेलमधील पदार्थ यांचे नियमित सेवन, ६) मांसाहाराचे अधिकप्रमाणात सेवन ७) योग्य प्रमाणात पाणी पिण्याची टाळाटाळ ८) सकाळी शौचाला जाण्याचा कंटाळा करणे, बध्दकोष्ठता म्हणजे शौचाला साफ न होणे. ९) अलोपॅथिच्या औषधांचे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर सेवन करणे. विशेषत्वाने वेदनाशामक (पेनकिलर) औषधांचा सतत आणि प्रमाणाबाहेर उपयोग करणे. १०) खाण्याच्या आणि जेवणाच्या वेळेतील अनियमितता आणि अस्ताव्यस्तता किंवा भूक नसताना खाण्याची सवय. ११) असमतोल आहार १२) सततची धावपळ, ताणतणावयुक्त जीवनपध्दती. या बारा कारणांचा विचार केला तर हे नक्की लक्षात येईल की, पित्ताच्या त्रासाचे मूळ आपल्या जीवनपध्दतीत म्हणजेच लाईफ स्टाईलमध्ये आहे. साहजिकच या त्रासातून मुक्त व्हायचे असेल तर आपणाला आपली जीवनपध्दती बदलावी लागणार आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात जगणार्या कुणालाही हा मान्य नसणारा विचार आहे. कारण, या सगळ्या जीवनपध्दतीतून मी एकटाच बाहेर पडलो तर मला पैसा कसा मिळणार आणि माझे घर कसे चालणार ? मी सुखी, समृध्द कसा होणार ? असे प्रश्न निर्माण होतात. या स्वयंनिर्मित भ्रमाला कवटाळून आपण स्वतःला या जीवनपध्दतीत सतत ढकलत राहतो. याचा व्हायचा तोच परिणाम होतो आणि नको त्या व्याधी लहान वयात मागे लागतात. मग डॉक्टरांचे उंबरठे झिजवत मिळवलेल्या पैशाचा उपयोग औषधांच्या खरेदीसाठी आणि दवाखान्यांची बिले भरण्यासाठी करावा लागतो. त्याशिवाय शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्याशिवाय कुटूंबाचे स्वास्थ्य बिघडते हे वेगळेच ! पण, एक गोष्ट तेवढीच खरी आहे की, जर आपण पैसा आपल्या सुखासाठी मिळवत असू तर त्या सुखाचा बळी देऊन मिळणार्या पैशाला काय अर्थ आहे? म्हणजेच पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवायचे आणि नंतर पुन्हा आरोग्य मिळवण्यासाठी मिळवलेला पैसा पाण्यासारखा खर्च करायचा, असा हा शुध्द वेडेपणाच नाही का ? आणि करोडो रुपये खर्चुन जरी नंतर आपणाला आरोग्य मिळाले तरी ते निसर्गाने सुरुवातीला दिलेल्या आरोग्याइतके शुध्द थोडेच असणार आहे? याचा अर्थ पैसे मिळवणे वाईट आहे किंवा ते मिळवूच नयेत असा अजिबात नाही. जगण्यासाठी आजकाल पैसा ही गरज आहे. पण, सर्वस्व नाही. आपण काय मिळवण्यासाठी कशाचा बळी देतोय हे पाहणे आवश्यक आहे. पैशासाठी आरोग्याचा बळी द्यावा लागत असेल तर ते सर्वस्वी चुकीचेच नव्हे तर घातक आहे, असे माझे मत आहे. त्यामुळे पित्ताच्या त्रासाची तक्रार करणार्या सगळ्यांनीच पुढचे गंभीर परिणाम टाळायचे असतील तर पैशापेक्षा आरोग्याला महत्त्व देऊन आपली जीवनशैली बदलण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. त्यामुळेच निसर्गोपचाराने दिलेली जीवनशैली या आजारात प्रभावीपणे काम करताना दिसते. कारण त्यात अजिबात औषध नाही. आपल्या जीवनशैलीतील बदल आणि निसर्गातील काही घटकांचा वापर करुन या व्याधीवर उपचार केले जात असल्याने हा आजार मुळातूनच उखडण्याची क्षमता त्यात आहे. पित्ताच्या त्रासाने त्रस्त असणार्यांनी खालीलप्रमाणे उपाय केल्यास त्यांना लाभ होऊ शकतो - १) सगळ्यात प्रथम 'लवकर निजे लवकर उठे' हे सूत्र लक्षात घेऊन रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी किमान तासभर आधी उठण्याची सवय लावून घेणे आवश्यक आहे. हे करत असताना किमान सहा तासांची झोप मिळेल असे नियोजन करणे आवश्यक आहे. २) त्यापाठोपाठ मद्यपान, धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, व्यसने या सगळ्यांपासून कटाक्षाने दूर रहावे. ३) चहा आणि कॉफी यासारख्या पेयांवर नियंत्रण ठेवावे. आजच्या जगात त्यापासून दूर राहणेे थोडेसे अडचणींचे असले तरी त्यावर नियंत्रण जरुर ठेवावे. ४) जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात. शक्यतो घरचेच पदार्थ खावेत. बाहेर जेवणे टाळावेच. भूक नसताना आहार घेऊ नये. तेलकट, मसालेदार पदार्थ प्रमाणातच घ्यावेत. जेवल्यावर चहा, कॉफी किंवा आईस्क्रिम खाऊ नये. अन्न खूप चावून खावे. मानसिक ताण असताना जेवण टाळावे. जेवताना पाणी पिऊ नये. रात्रीचे जेवण ८ पूर्वी घ्यावे. ५) विरुध्द अन्नाचा, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा, फास्ट फूडचा, बेकरीच्या पदार्थांचा, हवाबंद डब्यातील पदार्थांचा, कोल्डींक्सचा त्याग करावा. ६) पाश्चराईज्ड दुधापेक्षा ताजे दूध घ्यावे. ७) आहारात क्षारांत पदार्थांचा वापर वाढवावा. 1) पहाटे - एक ग्लास पाण्यात अर्धा लिंबू पिळावा. त्यात एक चमचा मध टाकावा आणि हे पाणी प्यावे. त्यानंतर बरोबर अर्ध्या तासाने एक चमचा (तीन ग्रॅम) गव्हांकूराचे चूर्ण एक ग्लास साध्या पाण्यासोबत घ्यावे. यानंतर साधारण एक तास काही खावू नये. 2) सकाळी 8 वाजता - २ केळी, १ गालास संत्र्याचा रस, १ फुलका आणि घरचे लोणी अगर एक खाकरा, चार ते पाच खजूराच्या बिया आणि सुंठ टाकून केलेला एक कप चहा घ्यावा. 3) दुपारच्या जेवणात - जेवणापूर्वी एक कप कोकम सरबत आणि थोडेसे गूळ - आले घ्यावे. जेवणात कोंडायुक्त कणकेचे फुलके, एक पालेभाजी, एक फळभाजी, कोशिंबीर, कवठाची चटणी, मुगाचे वरण अगर मोड आलेल्या मुगाची भाजी, हातसडीचा भात, जेवणाच्या शेवटी एक कप गोड ताक आणि जेवणानंतर थोडीशी आवळा सुपारी 4) दुपारी 4 वाजता - एक सफरचंद, तीन ते चार बदामबिया, दोन ते चार अंजीरे आणि अर्धाकप आल्याचा चहा घ्यावा. 5) रात्रीचे जेवण - हे दुपार प्रमाणेच असावे. बदल हवा असेल तर हिरव्या भाज्यांचे सूप, ग्रीन सॅलेड, दूध पोळी आणि थोडी मुगाची खिचडी घ्यावी. 6) रात्री झोपताना - एक ग्लास थंड दूध घ्यावे. या प्रमाणे आहार योजना केली तर पित्ताच्या विकारावर आपण विजय मिळवू शकतो. याप्रमाणे ज्यांना आपला दिनक्रम पाळणे शक्य नसेल त्यांनी सकाळी आणि रात्री जेवणानंतर स्पिरुलिना ची प्रत्येकी एक कॅप्सूल घ्यावी. तसेच रात्री झोपताना गव्हांकूर पावडरच्या दोन कॅप्सूल्स घ्याव्यात. यामुळे पित्ताच्या शमनाचे आणि पित्त विकारांच्या नाशाचे काम जलद गतीने होते. रुग्णाला आराम मिळतो आणि पित्तामुळे भविष्यात होणारे दुष्परिणाम टाळता येतात. आनंद कुलकर्णी निसर्गोपचार सल्लागार जयसिंगपूर, जि. कोल्हापूर मोबाईल - 7744964550 ई मेल - asknaturopathy@gmail.com

No comments:

Post a Comment

देशी गाईचे शुद्ध गावरान तूप

🐂    *देशी गाईचे शुद्ध गावरान तूप* 🐂 *आम्ही शंभर टक्के  देशी गाईच्या शुद्ध दुधापासून पारंपारिक पद्धतीने तयार केलेले *(घरगुती)*...

Search This Blog