औरंगाबाद येथील एका महिला रुग्णाने एक दिवस मला व्हॉटस अॅपवर त्यांचे सगळे रीपोर्टस् आणि त्यांच्या त्वचारोगाचे फोटो पाठवून दिले. गेली दहा वर्षे त्या या आजाराने त्रस्त आहेत. खूप उपचार केले पण तात्पुरते बरे वाटते आणि औषधे थांबवली की पुन्हा त्रास सुरु होतो अशी त्यांची व्यथा होती. मला जे विचारायचे होते ते विचारुन झाल्यावर मी त्यांना त्यांच्या त्वचारोगावर घरच्या घरी करता येतील असे नैसर्गिक उपाय सुचविले. माझ्याकडील काही सप्लिमेंटसही पाठवली. काही पथ्यही सुचविली. त्वचा रोग चिवट असतात, त्यांचे उपचारही तसेच चिवटपणे आणि निष्ठेने दीर्घकाळ करावे लागतात याची कल्पना त्यांना दिली. नंतर पंधरा दिवस त्यांचा काहीच संपर्क नव्हता. आज अचानक त्यांनी व्हॉटस् अॅपवर संदेश पाठवला, मला निसर्गोपचार, आयुर्वेदाने फायदा होत नाही म्हणून मी पुण्यातील एका प्रसिध्द त्वचारोग तज्ज्ञांचे उपचार सुरु केले आहेत.
त्या कुठल्या पॅथीने ब-या होतील हा माझ्या दृष्टीने इथे गौण प्रश्न आहे. पॅथीचा दुराग्रह नसावा, रुग्णाला आराम मिळण्यावर लक्ष असावे, हे माझे मत आहे. त्यामुळे त्यांच्या अन्य पॅथीकडे वळण्याच्या निर्णयाचे मला अजिबात वाईट वाटत नाही. माझा मुद्दा आहे तो हा की, चटकन बरे होण्याच्या मानसिकतेतून आपण अजूनही बाहेर पडत नाही. माझा एक डॉक्टर मित्र मला नेहमी सांगतो, त्याच्याकडे येणारे नव्वद टक्के रुग्ण हाच आग्रह धरतात, डॉक्टर काही तरी असं करा की मी अर्ध्यातासात बरा होवून कामावर जाऊ शकेन. अॅलोपॅथीत हे काही अंशी करताही येत असेल पण, जे त्या शास्त्रात आहे ते सगळ्याच वैद्यक शास्त्रात असेल असे नाही. निसर्गोपचारात तर असं अजिबात होत नाही, म्हणूनच या उपचार पध्दतीतील काही मूलभूत गोष्टींचा आपण आज इथे विचार करणार आहोत.
निसर्गोपचार ही लक्षणाधिष्ठीत उपचार पध्दती नाही. ती कारणाधिष्ठीत उपचार पध्दती आहे. म्हणजे निसर्गोपचारात आजारांचा विचार करताना लक्षणांवरुन कारणाचा शोध घेतला जातो. लक्षणाला आजार समजून उपचार केले जात नाहीत. उदाहरण पाहू म्हणजे हा मुद्दा लक्षात येईल. एखादा रुग्ण डोक दुखतय, पोटात दुखतय, चक्कर येते अशी चारपाच लक्षणे सांगत असेल तर त्या प्रत्येकासाठी वेगवेगळी औषधे किंवा उपचार निसर्गोपचारात दिले जात नाहीत. रुग्णाच्या या सगळ्या तक्रारी म्हणजे लक्षणे आहेत. व्याधी नव्हे असे मानले जाते आणि या लक्षणांच्या अनुषंगाने रुग्णाकडून अधिक माहिती मिळवली जाते. त्यानंतर या सगळ्याच्या आधारे व्याधीचे मूळ कारण निश्चित केले जाते आणि त्या मुळावर उपचार केले जातात. म्हणून निसर्गोपचारात एकदा व्याधी बरी झाली की पुन्हा लक्षणे दिसत नाहीत. म्हणूनच निसर्गोपचारात कमीत कमी औषधांचा वापर केलेला दिसतो.
आपल्या शरीरातील हजारो पेशी रोज मृत होतात, तितक्याच नवीन जन्माला येतात. या प्रक्रियेत शरीरात अनेक विषद्रव्ये तयार होतात. अन्न, पाणी आणि हवेच्या माध्यमातून शरीरात अनेक विषद्रव्ये जातात. याशिवाय न पचलेल्या अन्नातूनही शरीरात मल तयार होतो. ही सगळी घाण शरीरातून वेळच्या वेळी योग्य मार्गाने बाहेर पडणे आवश्यक असते. ही क्रिया घडली नाही तर शरीरात रोगजंतूना वाढीला पोषक भूमी तयार होते. यातून साथीच्या रोगांचे विषाणू शरीरात वाढतात आणि साथीचे रोग होतात. म्हणजेच साथीच्या रोगांचे कारण विषाणू नाहीत तर त्यांच्या वाढीला पोषक असलेली शरीरातील घाण आहे. ही घाण नसती तर विषाणू शरीरात जाऊनही काहीच झाले नसते. म्हणजेच शरीर स्वच्छ असणे आवश्यक आहे. दुर्दैवाने आपण शरीराच्या बाह्य स्वच्छतेकडे जितके लक्ष देतो तितकेच आतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असतो. निसर्गोपचारात या अंतर्गत स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. त्यासाठी उपचारासोबत पथ्य आणि दिनचर्येतील बदलावर भर दिला आहे. ही सगळी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ जरुर लागतो पण रोगाचे मूळच नाहीसे झाल्याने रोगाचा पुन्हा उद्भव होत नाही.
आपल्या शरीरातील उत्सर्जन संस्था अतिशय महत्वाची आहे, शरीरातून घाण बाहेर काढण्याचे काम या संस्थेने थांबवले की शरीरात ही घाण साठते आणि उपद्रव सुरु होतो. म्हणूनच निसर्गोपचारात उत्सर्जन संस्थेला बलशाली बनविण्यावर भर दिला जातो. त्याच सोबत शरीराचे पोषण होण्यासाठी पचनसंस्थेचे कार्य योग्य असणे आवश्यक असते. ते नसेल तर शरीर क्षीण होईलच पण न पचलेल्या अन्नाची समस्या तयार होईल. न पचलेल्या अन्नातून तयार झालेली घाण आणि क्षीण शरीर असा संयोग झाला तर आजार व्हायला कितीसा वेळ लागेल ? म्हणून निसर्गोपचार पचनशक्ती मजबूत कऱण्यावरही लक्ष केंद्रित केले जाते. यामुळेच निसर्गोपचारात काही पथ्य पाळायला लावली जातात. पचनसंस्थेवर अकारण ताण आणणा-या पदार्थांचे सेवन बंद केले जाते तर पचनाला चालना देणा-या गोष्टींचा मुद्दाम आहारात समावेश केला जातो.
थोडक्यात काय तर, पाश्चात्य वैद्यक शास्त्राने आजारांना विविध नावे दिली असली तरी आजार होण्याची प्रमुख तीन कारणे निसर्गोपचार मानतो.
1. शरीरातील विषद्रव्यांचा योग्य वेळी आणि योग्य मार्गाने निचरा होत नाही.
2. पचन संस्था योग्य पध्दतीने आणि पूर्ण ताकदीने काम करीत नाही.
3. या दोन्ही गोष्टींना बि्घडवणारी दिनचर्या रुग्णाची आहे.
आता उपचार करायचे असतील तर उलट्या क्रमाने गेले पाहिजे तरच रुग्ण कायमचा बरा होईल. प्रथमतः त्याची आजाराला निमंत्रण देणारी दिनचर्या बदलावी लागेल. नंतर त्याची पचनसंस्था सुदृढ होण्यासाठी उपाय करावे लागतील आणि त्याच वेळी शरीरातील सगळी घाण बाहेर काढण्यावर आणि नव्याने घाण साचणार नाही यावर भर देणारे उपाय करावे लागतील. निसर्गोपचाराचे मूलभूत विज्ञान हेच आहे. म्हणून केवळ दोनचार गोळ्या, रस आणि चूर्ण देणारा खरा निसर्गोपचारक नाहीच. इतक्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव ज्याच्या सल्ल्यात किंवा उपचारात आहे तोच योग्य मार्गाने निसर्गोपचार करतो असे म्हणावे लागेल.
निसर्गोपचारात सगळे शरीर एकसंध मानले जाते. त्यामुळे या शास्त्रात लक्षणे वेगवेगळ्या अवयवांवर दिसत असली तरी त्याचे मूळ शरीरात अन्यत्र असू शकते असा विचार केला जातो. म्हणून ब-याचदा डोकेदुखीची तक्रार असलेल्या रुग्णाला पोट साफ होण्याचा उपचार केला जातो आणि पोट साफ होवू लागताच ही तक्रार बंद होते असा अनुभव आहे. म्हणून आयुर्वेदात अथवा निसर्गोपचारात दिले जाणारे उपचार ब-याचदा वरुन विचित्र वाटले तरी तेच योग्य असतात कारण आजाराचे मूळच त्यामुळे उखडले जाते. यासाठी निसर्गोपचारात किंवा आयुर्वेदात तज्ज्ञांनी सांगितलेला प्रत्येक उपचार जसाच्या तसा आणि तितके दिवस निष्ठेने करणे महत्वाचे असते तरच त्याचा फायदा दिसतो. मग कदाचित हा काळ एक वर्ष किंवा दीड वर्षाचाही असू शकतो. माझ्या गेल्या दहा बारा वर्षाच्या कालखंडात अशा प्रकारे धीर धरुन वर्ष दीड वर्ष मी लिहून दिलेला प्रत्येक उपचार निष्ठेने केलेल्या आणि त्यायोगे अनेक वर्षांच्या जुनाट व्याधीतून मुक्त झालेल्या रुग्णांची उदाहरणे आहेत माझ्याकडे ...... आजारावर मात करुन स्वतः नॉर्मल होण्याच्या त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला आणि चिवटपणाला माझा खरोखरच प्रणाम ......
सगळ्यात महत्वाचे म्हणजे, आपल्याला आजाराला आणि त्याच्या लक्षणांना नॉर्मल करायचे आहे की रोग्याला नॉर्मल करायचे आहे याचा विचार उपचार करणारा आणि घेणारा अशा दोघांनीही केला पाहिजे. आजार आणि लक्षणे नॉर्मल करायची असतील तर पाश्चात्य वैद्यकशास्त्रात एकापेक्षा एक स्ट्रॉंग औषधे आहेत. त्याने हे काम चुटकीसरशी होईल. पण, रुग्णाला ऩॉर्मल करायचे असेल तर आयुर्वेद आणि निसर्गोपचाला पर्याय नाही. तसेच यासाठी आवश्यक असणारा कालावधी देवून उपचार करत राहण्यालाही पर्याय नाही. जितका आजार चिवट तितका त्यावरील उपचार चिवटपणे करावा लागतो, जितका आजार दीर्घकाळचा आहे तितका त्यावरचा उपचारही दीर्घकाल चालतो हे ,साधे सूत्र मनातून स्वीकारले तर ज्याला इंग्रजीत क्रॉनिक म्हणतात अशा आजारातून बाहेर काढण्याची ताकद आयुर्वेद आणि निसर्गोपचारात नक्कीच आहे. अत्यंतिक इमर्जन्सीत अॅलोपॅथीला पर्याय नाही जे जितके सत्य आहे तितकेच अशा क्रॉनिक आजारांना मुळासकट उखडण्यासाठी आयुर्वेद आणि निसर्गोपचाराशिवाय दुसरा मार्ग नाही हेही सत्य स्वीकारले गेले पाहिजे.
शेवटी कुठलीही उपचार पध्दती असली तरी त्याला मर्यादा या असतातच. त्यामुळे ज्या त्या उपचार पध्दतीला त्यांचा वेळ द्यावाच लागेल. अनेक डॉक्टर करणे हाही एक प्रकारचा आजारच म्हणावा लागेल. शेवटी गुण कुणाचाच येणार नाही, याचे भान ठेवले पाहिजे. त्वचारोगासारख्या रोगात तर हे भान हवेच हवे. प्रस्तुत घटनेच्या अनुषंगाने जेवढे लिहिता आले तेवढे लिहिले आहे. निसर्गोपचार किंवा आयुर्वेदात लवकर गुण येत नाही असे ज्यांना वाटते त्यांना त्यामागची कारणमीमांसा सांगावी एवढाच आजचा विषय होता. त्वचारोग हा स्वतंत्र चर्चेचा विषय असल्याने त्यावर पुढच्या लेखात काही लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करेन.
आनंद वामन कुलकर्णी
निस्रगोपचार सल्लागार
जयसिंगपूर 416101
मोबाईल - 7744964550 (Whats App)
No comments:
Post a Comment